“गरिबांचे पैसे गेले कुठे? घरकुल योजनेतील घरे अजून मिळालेली नाहीत”; काँग्रेसची सरकारवर टीका
Congress Vijay Wadettiwar Vidhan Sabha News: घरकुल योजनेबाबत विधानसभा अध्यक्षांनी गंभीर दखल घेतली.
Congress Vijay Wadettiwar Vidhan Sabha News: राज्यातील घरकुल योजनेतील घरं मंजूर होऊनही गेल्या तीन वर्षांपासून गरिबांना मिळाली नाही. या योजनेसाठी हक्काचा निधी मिळालेला नाही. या गंभीर मुद्द्यावरून आज विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारला धारेवर धरले. तीन पावसाळे झाले, लोकं कुठे राहत असतील याचा विचार करा. सरकार म्हणून जनाची नाही तर किमान मनाची तरी ठेवा, अशा शब्दांत वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला.
राज्यात अनेक लाभार्थ्यांना घरकुल योजनेअंतर्गत घरे मंजूर झाली आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून या घरांसाठीचा निधी रखडलेला आहे. अनेक लाभार्थ्यांनी घरांची बांधकामे सुरू केली आहेत, परंतु पैसे न मिळाल्याने ही कामे अर्धवट अवस्थेत आहेत.लोक आपली घरे सोडून कुठे राहत असतील याचा विचार सरकार करते का? सरकारकडून सतत लवकरात लवकर निधी देऊ ही उत्तर आहेत. हा ‘लवकर’ नक्की कधी येणार? असा सवाल वडेट्टीवार यांनी विधानसभेत विचारला.
तीन वर्षांपासून निधी रखडल्याने लाभार्थ्यांनी तीन पावसाळे त्यांनी कसे काढले असतील, याची सरकारला जाणीव आहे का? हे अधिवेशन संपेपर्यंत तरी गरिबांच्या खात्यात निधी जमा होणार का? असे प्रश्न वडेट्टीवार यांनी घरकुल योजनेबाबत उपस्थित केले.
दरम्यान, घरकुल योजनेबाबत विधानसभा अध्यक्षांनी गंभीर दखल घेतली. केंद्र शासनाकडून या उपक्रमासाठी किती निधी येणे अपेक्षित आहे आणि तो कधी उपलब्ध होणार, याचा सविस्तर पाठपुरावा करून हे अधिवेशन संपण्यापूर्वी शासनाने संपूर्ण माहिती सभागृहासमोर सादर करावी, असे निर्देश अध्यक्षांनी दिले आहेत.

